किन्नर : समाजाची अविभाज्य तिसरी बाजू!

 मी टीव्ही फार पाहत नाही त्यामुळे एका वाहिनीवर सुरू असणारा 'कानाला खडा' कार्यक्रम पाहण्याचाही योग सहसा येत नाही पण आज कामावरून परतलो तेव्हा टीव्हीवर हा कार्यक्रम चालू होता आणि त्यामध्ये कुणीतरी तृतीयपंथी व्यक्ती बोलत होती. तृतीयपंथीयांबद्दल माझी नेहमीच सकारात्मक भूमिका असल्याने मी साहजिकच कार्यक्रम पाहू लागलो. उत्तम मराठीत बोलणाऱ्या व्यक्तीने ( जिचे नाव गौरी सावंत आहे असे कळले ) जे काही सांगितलं त्याने फार वेदना झाल्या.

तृतीयपंथी ज्यांना किन्नर/हिजडा/छक्का अशा अनेक नावांनी आपण संबोधतो. संबोधतो कसले जवळजवळ हिणवतोच. आपल्यासारखीच तीही माणसं आहेत, त्यांनादेखील अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांखेरीज इतर भावना आहेत हे अनेकदा नाही नेहमीच आपण विसरतो किंवा सरळसरळ नाकारतो. त्यांनाही त्यांची नावे आहेत/असतात त्या नावाने त्यांना हाक मारली त्यांच्याशी मैत्री केली तर त्यांना चांगलंच वाटेल, कारण त्यांनाही भावना आहेत. यांना समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न सर्वत्र, सातत्याने झाला पाहिजे. गौरीने वैद्यकीय सेवादेखील दुजाभाव करत असल्याचं सांगितलं तेव्हा फार वाईट वाटलं. खरं तर तिने जो अनुभव सांगितला तो हादरवून टाकणारा होता. निदान जे सुशिक्षित आहेत, जे विज्ञान जाणतात अशांकडून तरी ही मुळीच अपेक्षा नाही. आपण त्यांना आपल्यासारखं मन आहे हे समजून घेत नाही, त्यांना नीट वागणूक देत नाही म्हणून त्यांना नाईलाजाने टाळ्या वाजवाव्या लागतात, पैसे मागावे लागतात अन्यथा कुणाला हौस असेल उपेक्षित म्हणून जगायची? गेले कित्येक दिवस मनात काही योजना सुरू होत्या, यानिमित्ताने त्या परत उफाळून आल्या. पुन्हा विचार सुरू झाले. वेळ लागेल पण बदल घडेल. हे चित्र बदलण्यासाठी आपण नक्की पुढाकार घ्यायला हवा, घेऊ.

◆ आपण काय करू शकतो :
===================

जे चाललं आहे ते लगेच निश्चितच बदलणार नाही याची आपल्यालाच काय त्यांनादेखील कल्पना आहे पण आपण एक सुरुवात तर करू शकतो.

● सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथी व्यक्ती दिसल्या तर त्यांच्याकडे पाहून कमेंट्स पास करू नयेत. मदत करणे शक्य नसले तर निदान टवाळक्या करू नयेत. जमल्यास एक छानसं स्मित करावं. लक्षात ठेवा तिरस्काराने झालेली जखम स्मिताने भरून निघते. (हे मी करून पाहिलेलं आहे, करतो. ही मंडळी छान प्रतिसादही देतात.)

● कुठेही या व्यक्ती दिसल्या/भेटल्या की दूर पळू नये. त्यांच्याशी बोलावं. आपल्याकडे पैसे नाहीत हे नीट समजावून सांगितल्यास ते समजून घेतात किंवा तुम्ही द्याल तेवढंच घेऊन निघून जातात हा माझा स्वतःचा अनुभव आहे.

● त्यांची नोकरी करण्याची कितीही इच्छा असली तरी कुणीही त्यांना कामावर ठेवत नाहीत आणि तसं केल्यास ग्राहक किंवा इतर सहकारी त्या मालकालाच वाळीत टाकण्याची शक्यता अधिक असते साहजिकच पैसे मागणे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर असतो. म्हणूनच जेव्हा कधी तुमच्या दुकानात/दारावर ही मंडळी येतील तेव्हा त्यांना शक्य तेवढी मदत करा. मी स्वतः धडधाकट भिकाऱ्याला किंवा मद्यपीला एक रुपयादेखील देत नाही पण यांना आवर्जून शक्य असतील तेवढे पैसे देतो. सकाळची वेळ असेल आणि पहिलं ग्राहकही अजून आलेलं नसेल तर ते सांगितल्यावर ही मंडळी निघून जातात हा माझा अनुभव आहे. हड-तुड केल्यास त्यांना राग येतो आणि ते स्वाभाविकही आहे.

●आपल्या मुलांचं, मित्रमैत्रिणींचं, घरच्यांचं, दुकानातील स्टाफचं किंबहुना संपर्कात येणाऱ्या सर्वांचं यांच्याबद्दलचं मत बदलण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याबद्दलची योग्य माहिती त्यांना द्या. लगेच सगळं बदलेल असं नाही पण सुरुवात तर होईल?

●त्यांनाही मन आहे, त्यांनाही भावना आहेत. आपल्यासारखी त्यांचीही काही स्वप्नं असतील. त्यांना ती पहायचा पूर्ण हक्क आहे पण तुमच्या भावनांचा ओलावा त्यांना मिळाला तर त्यांना ती स्वप्नं पूर्णही करता येतील.

सहानुभूती नको, विश्वास ठेवा..मित्र/मैत्रीण म्हणून साद द्या, बघा काही वर्षांनी नक्कीच चित्र बदललेलं असेल. आपल्या पुढच्या पिढीला आपलाही अभिमान वाटेल, न डगमगता एक पाऊल वेळीच पुढे टाकल्याबद्दल....

करायचं ना एवढं ?

©अनिल विद्याधर आठलेकर, पुणे
 📲  9762162942

Comments

  1. बरोबर लिहिलं अनिल, पटलं !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !