Posts

Showing posts from October, 2018

मालवणी लघुकथा : 'नवस'

 गावकारवाड्याकडसून पातळेश्वराकडे जाताना कोपऱ्यार   बारक्याशा घरात मधू टेमकार   ऱ्हवा. घर म्हणाक फक्त घर ता. खरा तर ती झोपडीच पण मागल्या वर्सा मधग्याक खयतरी मटको लागलो तेवा चार मेडी पुरून आणि वर वासे बिसे टाकून गावठी नळे घालून घेतल्यान वरते म्हणान तेका घर म्हणायचा इतक्याच.  मधग्याक तीन पोरा. दोन चेडवा आणि एक झिल- बाबलो! मधग्याक दारूची सवय कोणी लावली माह्यत नाय पण बाबल्याच्या बघण्यात असो एकय दिवस जावंक नाय जेव्हा मधगो पिवन येवक नाय. बाबल्याची आवस म्हणजे मोनी गाय! बापाशीन मधग्यावांगडा लगीन लावन दिल्यान म्हणान गप तेच्यावांगडा संसार करी. हुं नाय की चूं नाय. कोणाचो तरवो लावक जा, कोणाचे रतांबे फोडुक जा कोणाचे कपडे धुवक जा असा करून बिचारी घर चलय. मधगो मधी मधी पैसे हाडी पण ते तेका दारूकच पुरत नाय. मोठी दोन चेडवा तेंचा नशीब बरा म्हणान चांगल्या घरात पडली.  नाईकांच्या सुनल्यान स्थळा हाडल्यान मुंबईकर चाकरमानी. एक तेचो पाव्हनो आणि दुसरो तेचो वांगडी. सगळी परस्थिती अगोदरच सांगलली असल्यामुळे दोघांनीव नारळ आणि चेडू देवा आमका बाकी काय नको.. अशी मागणी घातल्यानी आणि ...

निगर्वी, नम्र आणि अभ्यासू लेखिका : वीणा गवाणकर

Image
स्नेहल प्रकाशनाचा यावर्षीचा 'स्नेहांजली पुरस्कार' प्रसिद्ध लेखिका, चरित्रकार वीणा गवाणकर यांना नुकताच एस.एम.जोशी सभागृह, पुणे येथे डॉ. गो.बं. देगलूरकर यांच्या हस्ते देण्यात आला त्यानिमित्ताने.. ______________________________________________________________________ वीणा गवाणकर यांच्याशी आपली पहिली भेट होते ती त्याच्या अफाट लोकप्रिय अशा 'एक होता कार्व्हर' या पुस्तकाच्या माध्यमातून. जवळजवळ ४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकाच्या आजवर दीड लाखाच्यावर प्रती विकल्या गेल्या आहेत आणि अजूनही हा ओघ सुरूच आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या अद्भुत, अविश्वसनीय, अफाट आशा कर्तृत्वाची ओळख वीणाताईंनी त्याच्या सहजसुंदर शैलीत करून दिली आहे. हे पुस्तक अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. इतकं सारं यश मिळालेलं असूनही वीणा गवाणकर मात्र नम्रपणे हे सारं श्रेय आपल्यातील वाचकाचं आहे असं मानतात. 'मी आधी वाचक आहे लेखिका वगैरे नंतर!' वाचनाच्या आवडीतून वीणाताईंनी ग्रंथपालनाची पदव्युत्तर पदविका घेतली. त्यानंतर ग्रंथपाल म्हणून काम करताना अनेक थोरा-मोठ्यांचा सहवास त्यांना ला...

मनाचा वॉर्डरोब

 बघ,  सांगत होतो नको उघडूस,  तरी तुला राहवलं नाहीच. कधी नसतो उघडायचा असा मनाचा वॉर्डरोब कुणाचा. त्यात असतात अर्धवट तुटलेल्या असंख्य चांदण्या, जायबंदी झालेला चंद्र, ठिगळं लावलेलं आकाश, आकसलेलं क्षितिज वगैरे कोंबून भरलेले. कुठंतरी उभा असतो अंग चोरत एखादा अस्तित्वहीन शहारा त्याला आणू नये प्रकाशात असं, कसाबसा दाबून ठेवलेला हुंदका होऊ शकतो अनावर त्याचा. अंधाराच्या डोळयांची सवय झालेला निवांत कोपरा न कोपरा उजेडात आला की बिथरण्याचीच जास्त शक्यता असते. त्यांना बाहेर येण्याची मुभा देऊ नये, शक्य झालंच तर एक भलं मोठं कुलूप लावावं बाहेरून आणि चावी द्यावी फेकून दूर कुठेतरी. पंख तुटलेल्या पक्ष्यांनी नसतात पहायची स्वप्नं आकाशवारीची, त्यांच्या नशिबी खितपत पडणंच असतं हे ठसायला वेळ लागतो म्हणून, म्हणून काढू नये त्यांना बाहेर कधीही कुलुपाच्या. अशा एकेक दिव्य विचारांच्या माळा आता होत जातील अधिकाधिक लांब, त्यांना आवरणं कठीण जाईल तुला, म्हणून म्हणतो, असा उघडू नये कधी कुणाच्या मनाचा वॉर्डरोब...  __ अनिल विद्याधर आठलेकर