अंतू बर्वा आणि मी..

 ~~~~~~~~~~~~~

 मी : ''नमस्कार अंतूशेठ...''.

अंतू बर्वा : '' अरे वा वा! जावईबापू.. नमस्कार, या.. कसे काय येणे केलेत? ''

मी : " काही नाही सहज...''

अंतू : '' छे छे.. काहीतरी सांगायचे आहे काय? सांगा बिनधास्त! मी काही कुणास सांगायचा नाही.''

मी : '' अंतूशेठ, काही मंडळी इतक्या सुंदर, दर्जेदार लेखनास दर्जा नाही म्हणतात, नावे ठेवतात. ''

अंतूशेठ : ''ठेवणारच ते जावयबापू! चांगला अंगभर कपडा घातलेला असूनही अगदी त्यास पडलेले छोटे भोक पाहणाऱ्यास सगळे छिद्रमयच दिसायचे हो! त्यास तुम्ही आणि मी काही करू शकत नाही. त्या विश्वेश्वरासही
अक्कल शिकवायस ते कमी करायचे नाहीत. अशा लोकांचा स्वतःचा मात्र अण्णू गोगट्या झाला तरी त्यांस ते कवायतीचा विलायती प्रकार म्हणतील. तुम्ही आपले वाचत रहा हो जावईबापू. तुकोबामहाराज काय म्हणतात ठाऊक आहे? ''

मी : " काय? ''

अंतू : ''लोक जैसा ओक | धरितां धरवेना
          अभक्ता जिरेना  | संतसंग ||

         समजले काय?''

मी : '' होय अंतूशेठ, तुम्ही मला माझ्या सासरेबुवांसारखेच आहात म्हणून तुमच्याशी आपलं मन मोकळं केलं. ''

अंतू : '' बरे वाटले हो! नाहीतर या म्हाताऱ्यास कोण विचारतो? अडगळ म्हणतात हो हल्ली अडगळ! चालायचेच. अधूनमधून येत जा, तुम्ही आलात की या अंधाऱ्या खोलीतही चार उजेडाचे कण येतात. बाकी त्या विश्वेश्वरास काळजी.... ''

मी : '' खरंय. येतो अंतूशेठ काळजी घ्या...''

अंतू  : ( सगळं दु:ख लपवून दिलखुलास हसत ) या, या.. मज कसली धाड भरतेय? वाट बघत बसलेला असेन हा असा इथेच...

©अनिल वि. आठलेकर
आठ नोव्हेंबर एकोणीस
चलभाष : ९७६२१६२९४२

~~~~~~~~~~~~★★ ~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !